रत्नागिरी : शहरातील डम्पिंग ग्राउंडवर सातत्याने लागणाऱ्या आगी थांबविण्याबाबत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नगरसेविका पूजा दीपक पवार यांनी निवेदन दिले.
शहरातील साळवी येथील डम्पिंग ग्राउंड येथे टाकलेल्या कचऱ्याला सातत्याने लागणाऱ्या आगीमुळे आजूबाजूला धोका निर्माण होत असून आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे या आगीवर तातडीने नियंत्रण घालावे, अशी मागणी पूजा पवार यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे केली आहे.
साळवी स्टॉप येथे डम्पिंग ग्राउंडमध्ये शहरातील कचरा टाकला जातो. या कचऱ्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यवर परिणाम होत असतानाच या कचऱ्याला रात्री आगी लागतात. यामुळे परिसरात धोका निर्माण होत असून त्यातून निर्माण होणारा विषारी धूर संपूर्ण परिसरात पसरत असून त्यामुळे आरोग्याला याचा धोका आहे. या धुरामुळे आजूबाजूच्या नागरिकांना, रुग्णांना सतत त्रास होत असतो. तसेच डोळ्यांची जळजळ, घशाचे संक्रमण यांसारख्या तक्रारी रहिवाशांमध्ये वाढत आहेत. यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सौ. पूजा दीपक पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी त्या ठिकाणी तत्काळ अग्निशमन दल किंवा पाण्याची टँकरची व्यवस्था तत्काळ करावी. यावेळी त्यांच्यासोबत विभागप्रमुख दीपक पवारदेखील उपस्थित होते.
रत्नागिरी : डम्पिंग ग्राउंडवरील आगी थांबविण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन







