रत्नागिरी: तालुक्यातील गणेशगुळे येथील राजश्री राजाराम गुरव (वय ६७) या वृद्धेचा श्वसनाचा त्रास झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. राहत्या घरी अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.मिळालेल्या माहितीनुसार, ९ मार्च २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास राजश्री गुरव या आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, थोड्याच वेळात त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांनी तातडीने खोलीच्या बाहेर येऊन पुतण्या विक्रम शांताराम गुरव यांना याबाबत माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नातेवाईकांनी त्यांना खाजगी वाहनाने तातडीने रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, १० मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजून २१ मिनिटांच्या सुमारास रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.या घटनेची प्राथमिक नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने करण्यात आली होती. त्यानंतर या आकस्मिक मृत्यू प्रकरणाची कागदपत्रे टपालाद्वारे पूर्णगड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहेत. ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पूर्णगड पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
रत्नागिरी : गणेशगुळे येथील वृद्धेचा आकस्मिक मृत्यू






