रत्नागिरी: शहरातील साळवी स्टॉप परिसरात काही दिवसांपूर्वी एक नवजात अर्भक बेवारस स्थितीत मिळून आले होते. या बाळाच्या वारसांचा अद्याप पत्ता लागलेला नसून, संबंधित पालकांनी किंवा नातेवाईकांनी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या अर्भकाच्या सुरक्षिततेसाठी आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी बाल कल्याण समिती आता सरसावली आहे.
ही माहिती अधिकृतपणे प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत जर कोणीही या बाळाच्या पालकत्वाचा कायदेशीर दावा केला नाही, तर त्या बाळाला नियमानुसार बेवारस घोषित केले जाणार आहे. त्यानंतर या अर्भकाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी बाल कल्याण समिती रत्नागिरी व भारतीय समाज सेवा केंद्र, चिपळूण यांच्यामार्फत पुढील कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बाळाच्या भविष्यासाठी आणि त्याला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
या अर्भकाबाबत अधिक माहिती असल्यास किंवा पालकत्वाचा दावा करायचा असल्यास नागरिकांनी भारतीय समाज सेवा केंद्र, रामतीर्थ तलावासमोर, शंकरवाडी रोड, मार्कंडी, चिपळूण (मोबाईल क्रमांक: ९९२२९१२७३४) येथे संपर्क साधावा. तसेच, जिल्हा बाल कल्याण समिती, अभ्यंकर व पानवलकर निरीक्षणगृह, जेल रोड, रत्नागिरी येथेही प्रत्यक्ष भेट देऊन माहिती देता येईल, असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.





