रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा ते पाली दरम्यान असलेल्या चारवेली गावच्या उतारावर गुरुवारी सायंकाळी दोन टँकरमध्ये भीषण अपघात झाला. एका भरधाव पाणी टँकरने पुढे जाणाऱ्या गॅस टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही चालक जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास सुरज नमिसाहब शेख (वय ३५, रा. लातूर) हे आपल्या ताब्यातील गॅस टँकर (क्र. के.ए.०१.ए.एच. ४०५२) घेऊन हातखंबाकडून पालीच्या दिशेने जात होते. चारवेली गावचा उतार उतरत असताना, पाठीमागून येणाऱ्या पाणी टँकरच्या (क्र. एम.एच.०८.ए.बी. १८३१) चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिवेगाने चालवून गॅस टँकरला पाठीमागून धडक दिली.
या अपघातात फिर्यादी सुरज शेख आणि आरोपी टँकर चालक रामविलास अर्जुन सिंग (वय ५०, रा. बिहार) हे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने गॅस टँकरला धडक बसूनही मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी आरोपी चालक रामविलास सिंग याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर ४४/२०२६ नुसार गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.







