देवरुख: रत्नागिरी दक्षिण भाजप महिला मोर्चा संघटन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पक्षाच्या उच्च नेतृत्वाने सौ. रुपाली रुपेश कदम यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले जात आहे. रत्नागिरी दक्षिण भागातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून महिला नेतृत्वाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने त्यांच्या नावाची निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद निवडणुकीत सौ. रुपाली कदम यांनी अत्यंत अटीतटीची आणि उल्लेखनीय लढत दिली होती. त्यांनी भक्कम मताधिक्याने स्पर्धा करताना महिलांमध्ये, तरुणांमध्ये आणि सामाजिक स्तरावर प्रभावी जनसंपर्क निर्माण केला होता. त्यांच्या लढाऊ वृत्तीची, सातत्यपूर्ण कार्याची व सामाजिक क्षेत्रातील सक्रियतेची दखल घेत पक्षाने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.
ही निवड खासदार नारायण राणे आणि मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
नियुक्तीनंतर बोलताना सौ. कदम यांनी रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चा अधिक गतिमान व सर्वसमावेशक करण्याचा विश्वास व्यक्त केला. महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण, संघटन विस्तार आणि भाजपची विचारधारा घराघरात पोहोचवण्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची आपली बांधिलकी त्यांनी व्यक्त केली.
रुपाली कदम यांची भाजप रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती






