रत्नागिरी : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड (LOIL) या प्रकल्पाबाबत कंपनीने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली असून, हा प्रकल्प सर्व पर्यावरणीय, सुरक्षा आणि नियामक नियमांचे काटेकोरपणे पालन करत असल्याचे जाहीर केले आहे. शुक्रवारी आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवर आणि जागतिक दर्जाच्या सुरक्षिततेवर शिक्कामोर्तब केले. लोटे येथील हा प्रकल्प स्थापनेपासूनच सर्व आवश्यक वैधानिक परवानग्या घेऊन कार्यरत असून, पर्यावरणाचे रक्षण करतानाच देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी माहिती देताना कंपनीचे उत्पादन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक पाटील म्हणाले की, प्रकल्पातून बाहेर पडणारे सांडपाणी किंवा प्रक्रिया उत्सर्जन हे कोणत्याही प्रकारे पर्यावरणास हानी पोहोचवत नाही. या प्रकल्पात अत्याधुनिक ‘क्लोज्ड-लूप’ प्रणालीचा वापर केला जातो, ज्यामुळे कोणतेही हानिकारक घटक बाहेर पडण्याची शक्यता उरत नाही. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उच्च क्षमतेची अत्याधुनिक संयंत्रे कार्यान्वित असून, प्रक्रिया केलेले पाणी आणि धोकादायक कचरा हा केवळ राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त केंद्रांकडेच सुरक्षित विल्हेवाटीसाठी पाठवला जातो. विशेष म्हणजे, येथील सर्व प्रक्रिया डिजिटल ट्रेसेबिलिटी प्रणालीद्वारे नियंत्रित केल्या जातात, ज्यामुळे कचरा व्यवस्थापनात पूर्ण पारदर्शकता येते. प्रकल्पातील फ्लोअरिंगपासून ते सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत सर्वच ठिकाणी उच्च दर्जाची मानके राखली गेली आहेत.
जागतिक स्तरावर फ्ल्युरिन रसायनशास्त्राचा वापर अत्यंत कडक नियमावलीत केला जातो आणि लक्ष्मी ऑर्गॅनिक देखील त्याच जागतिक मानकांचे पालन करत आहे. या प्रकल्पात तयार होणारी उत्पादने सेमीकंडक्टर, संरक्षण क्षेत्र, इलेक्ट्रिक वाहने आणि औषधनिर्मिती अशा महत्त्वपूर्ण उद्योगांसाठी अत्यंत आवश्यक आहेत. नियामक संस्था आणि स्थानिक हितधारकांशी सतत संवाद साधून पारदर्शकता जपण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या पत्रकार परिषदेला कंपनीचे उत्पादन विभागाचे अध्यक्ष राजेश नाईक आणि पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष उदय वैशंपायन हे देखील उपस्थित होते. कंपनीने दिलेल्या या सविस्तर स्पष्टीकरणामुळे लोटे येथील प्रकल्पाच्या पर्यावरणीय सुरक्षेबाबत असलेली अधिकृत स्थिती आता स्पष्ट झाली आहे.






