क्रेडिट कार्ड इन्शुरन्स बंद करण्याच्या बहाण्याने रत्नागिरीतील तरुणाची ८७ हजारांची ऑनलाईन फसवणूक

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी: क्रेडिट कार्डवरील इन्शुरन्स बंद करून देण्याच्या बहाण्याने एका सायबर भामट्याने रत्नागिरीतील एका तरुणाला तब्बल ८७ हजार ६४२ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ऑनलाईन फसवणुकीच्या या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नाचणे येथील श्रीरामनगर भागात राहणारे प्रसाद रघुनाथ यादव (वय ३१) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, ही घटना टीआरपी येथील यामाहा शोरूममध्ये ते कामावर असताना घडली.

मिळालेली माहिती अशी की, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० ते १.११ च्या दरम्यान फिर्यादी प्रसाद यादव आपल्या कामात असताना त्यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला. संबंधित इसमाने आपण एसबीआय क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवून यादव यांच्या क्रेडिट कार्डवरील इन्शुरन्स बाबत विचारणा केली. हा इन्शुरन्स बंद (डिअॅक्टीवेट) करण्यासाठी ठराविक प्रक्रिया करावी लागेल असे सांगून आरोपीने फिर्यादीच्या व्हॉट्सॲपवर एक लिंक आणि ‘SBI CREDIT CARD.apk’ नावाची एक संशयास्पद फाईल पाठवली. ही लिंक उघडून त्यात वैयक्तिक आणि बँक खात्याची माहिती भरण्यास फिर्यादीला भाग पाडले.

आरोपीने सांगितलेल्या प्रक्रियेनुसार माहिती भरताच, काही वेळातच फिर्यादीच्या क्रेडिट कार्डवरून एकूण ८७ हजार ६४२ रुपये परस्पर वळवण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रसाद यादव यांनी पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात मोबाईल क्रमांक धारकावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क) व ६६(ड) नुसार गुन्हा (रजि. नं. ८४/२०२६) दाखल केला आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा संशयास्पद ‘apk’ फाईल डाऊनलोड करू नये, असे आवाहन पोलिसांनी यानिमित्ताने केले असून या सायबर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *