रत्नागिरी: तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथे एका ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शैलेश रवींद्र पवार असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी, ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत शैलेशचे वडील रवींद्र गणपत पवार हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास गवंडी कामासाठी सडये गावी गेले होते, तर त्यांची पत्नी अंगणवाडीत कामाला गेल्या होत्या. यावेळी शैलेश घरामध्ये एकटाच होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास शैलेशची आई कामावरून घरी परतली असता घराचे दरवाजे आणि खिडक्या आतून बंद असल्याचे तिला दिसून आले. काही वेळाने शैलेशचे वडीलही घरी परतले. त्यांनी घराच्या मागील दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केला असता, समोरचे दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. शैलेशने हॉलमधील लाकडी बाराला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला होता.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शैलेशने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी वडील रवींद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भरल्या घरात तरुणाने अशा प्रकारे आयुष्य संपवल्यामुळे कोतवडे उंबरवाडी परिसरात शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







