रत्नागिरी: साळवी स्टॉप परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय विवाहितेने कौटुंबिक वादातून उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मेनका युवराज चव्हाण असे मृत महिलेचे नाव असून, कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मेनका चव्हाण यांचे पती १२ एप्रिलच्या रात्री उशिरा घरी परतले होते, त्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. याच वादाच्या रागातून मेनका यांनी घरात असलेले उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. त्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच पती युवराज चव्हाण यांनी त्यांना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना १२ एप्रिल रोजी सकाळी ७.४५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेबाबतची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी १६ एप्रिल रोजी दुपारी २.५४ वाजता या प्रकरणाची अधिकृत नोंद केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अंतर्गत हे आवेदन दाखल करण्यात आले असून, पोलीस या आत्महत्येमागच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास करत आहेत. एका क्षणी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे साळवी स्टॉप परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणी कुटुंबीयांचे जबाब नोंदवून घेत असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.





