रत्नागिरी: जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदाचा आणि फोटोंचा गैरवापर करून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही अज्ञात समाजकंटकांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नाव आणि फोटो वापरून बनावट व्हॉट्सॲप अकाउंट्स तयार केले असून, त्याद्वारे नागरिकांना मेसेज पाठवून पैशांची मागणी केली जात आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेत नागरिकांना सायबर भामट्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांनी आपली कार्यपद्धती बदलली असून, ते आता थेट उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या ओळखीचा आधार घेत आहेत. बनावट मोबाईल क्रमांकावरून पाठवण्यात येणाऱ्या या व्हॉट्सॲप मेसेजमध्ये “अत्यंत तातडीची गरज आहे” किंवा “महत्त्वाचे काम अडकले आहे” असे भासवून समोरच्या व्यक्तीला भावनिक साद घातली जाते. त्यानंतर बँक खाते क्रमांक किंवा यु.पी.आय. आयडी देऊन तातडीने पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले जाते. अनेकदा घाईघाईत नागरिक मेसेजमधील फोटो पाहून संबंधित अधिकारीच मदत मागत असल्याचे समजून या फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता असते.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणताही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अशा प्रकारे वैयक्तिक कारणासाठी किंवा अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कधीही आर्थिक व्यवहाराची मागणी करत नाही. नागरिकांनी अशा कोणत्याही फसव्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये आणि संशयास्पद वाटणाऱ्या मेसेजची शहानिशा केल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नये. अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करणे किंवा आपली वैयक्तिक व कार्यालयीन गोपनीय माहिती शेअर करणे धोक्याचे ठरू शकते.
जर कोणालाही अशा प्रकारचे संशयास्पद संदेश प्राप्त झाले, तर त्यांनी तातडीने नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा किंवा केंद्र सरकारच्या ‘www.cybercrime.gov.in’ या अधिकृत पोर्टलवर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सायबर सेल देखील या प्रकरणाचा तपास करत असून, नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक राहून सायबर गुन्हेगारांचे प्रयत्न हाणून पाडावेत, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.







