रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी तालुक्यातील टिके भातडेवाडी येथे एका ४१ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगेश तुकाराम कांबळे (वय ४१, रा. टिके भातडेवाडी, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सततचे आजारपण आणि दारूचे व्यसन यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी २१ एप्रिल रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते बुधवार २२ एप्रिल रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या दरम्यान घडली. मंगेश कांबळे हे गेल्या काही काळापासून आजारपणामुळे त्रस्त होते, तसेच त्यांना दारूचे व्यसनही होते. याच कारणातून त्यांनी राहत्या घरी स्वतःला गळफास लावून घेतला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी सकाळी ११.४६ वाजता या प्रकरणाची रीतसर नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. एका तरुणाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने भातडेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.





