रत्नागिरी: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर नाणीज जनामठ येथे एका भरधाव स्विफ्ट कारने दिलेल्या धडकेत दोन तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातस्थळी असलेल्या गर्दीचा अंदाज न घेता कार चालकाने वाहन अतिवेगात व निष्काळजीपणे चालवल्याने हा अपघात झाला असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नाणीज जनामठ परिसरात कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने स्विफ्ट कार (क्रमांक एमएच-०८-आर-१०१७) जात होती. यावेळी कार चालक वसिम अब्दुल रहेमान (वय ४०, रा. राजिवडा, मच्छिमार्केट) याने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपली गाडी हयगयीने चालवली. या कारने रस्त्यावरील करण बाळकृष्ण शिवगण (वय २५, रा. नाणीज) आणि प्रथमेश विनोद बेंद्रे (वय २४, रा. मिरजोळे) यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत करण शिवगण याला गंभीर दुखापत झाली असून प्रथमेश बेंद्रे हा किरकोळ जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच नाणीज गावचे पोलीस पाटील नितीन रामा कांबळे यांनी तातडीने ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या फिर्यादीवरून पोलिसांनी चालक वसिम अब्दुल रहेमान याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावर गर्दी असतानाही चालकाने दाखवलेल्या बेजबाबदारपणामुळे दोन तरुणांना आपल्या प्राणांतिक संकटाचा सामना करावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






