चिपळूण (प्रतिनिधी) : कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी दोनवेळा विद्युतगृह आणि अनुषंगिक कार्यासाठी चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील जमीन संपादित करण्यात आली. मात्र, त्यावेळी दिलेली आश्वासनांची पूर्तता झाली नाही अशा स्वरूपाच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यावर आजवर अपेक्षित यश आले नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी जनजागर प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण पुनर्स्थापना संनियंत्रण समिती महाराष्ट्र प्रदेश (मंत्री दर्जा) उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच राज्य समन्वयक देवराज देशमुख आणि उत्तर कोकण विभाग संपर्क प्रमुख दिलीप गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत,करमणूक केंद्र अलोरे येथे प्रकल्पग्रस्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य पुनर्वसन प्राधिकरण उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले भांडारी हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीने युती सरकारकडून प्रकल्पग्रस्तांना वेगळ्या पद्धतीने आर्थिक लाभ, सवलती, सुविधा याविषयी संवाद साधण्यात येणार आहे. अलोरे, नागावे, पेढांबे, कोळकेवाडी, कोंडफणसवणे, पिंपळी गावातील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या शासनापर्यंत पोचवून सोडविण्याचे दृष्टीने यावेळी उपस्थित राहणे गरजेचे आहे. तरी सर्वांनी ११ वाजता मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन निमंत्रक पांडुरंग शिंदे (कोळकेवाडी) यांनी केले आहे.






