खंडाळा प्रतिनिधी : वाटद येथील एमआयडीसी प्रकल्पाच्या उभारणीला आता वेग मिळू लागला असून, संबंधित भू-संपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रत्नागिरी तालुक्यातील वाटद आणि कळझोंडी या गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात आली असून, प्रकल्पासाठी आवश्यक असलेले मोठे क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या औद्योगिक प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
कोकणातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या एमआयडीसीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक नकाशात मोठी भर पडणार आहे. जागतिक दर्जाच्या उद्योगसमूहांनी या परिसरात गुंतवणुकीसाठी सकारात्मक भूमिका घेतल्याने स्थानिक पातळीवरही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्योग उभारणीमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, युवकांचे स्थलांतर रोखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्याचे उद्योगमंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासकीय अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या पुढाकारामुळेच प्रकल्पाच्या प्रक्रियेला गती मिळाल्याचे बोलले जात आहे. या प्रकल्पामुळे केवळ मोठे उद्योगच नव्हे, तर पूरक लघुउद्योगांनाही चालना मिळणार असून, स्थानिक व्यावसायिकांसाठीही नवीन संधी निर्माण होणार आहेत.
एमआयडीसीच्या विकासामुळे वाहतूक, हॉटेल व्यवसाय, सेवा क्षेत्र आणि बांधकाम क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. औद्योगिक क्रांतीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल संपूर्ण जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचे मानले जात आहे. संयुक्त मोजणीनंतर आता भू-संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, पुढील काही महिन्यांत प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.





