GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-गोवा महामार्गाव तुरळ येथे साईटपट्टीची दुरवस्था, ठेकेदाराच्या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांचा संताप

Gramin Varta
190 Views

धामणी : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ परिसरात सध्या जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महामार्गाच्या साइडपट्ट्यांची अक्षरशः दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेले पावसाचे पाणी यामुळे वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. दिवसेंदिवस अपघातांची शक्यता वाढत असतानाही कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

तुरळ परिसरातून कडवईसह इतर गावांकडे जाणाऱ्या नागरिकांना सुरक्षित उड्डाणपूल नसल्याने जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे. भरधाव वाहनांमुळे येथे वारंवार अपघात घडत असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काहींना आपला जीव गमवावा लागल्याचीही खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. “चौपदरीकरणाच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ सुरू आहे का?” असा संतप्त सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आला.

महामार्गाचे काम सुरू असताना मूलभूत सुविधा आणि सुरक्षेकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. साइडपट्ट्यांची तातडीने दुरुस्ती, पावसाच्या पाण्याचा निचरा, प्रवाशांसाठी निवारा शेड तसेच सुरक्षित उड्डाणपूल उभारण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

वेळीच उपाययोजना न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Total Visitor Counter

3425484
Share This Article