GRAMIN SEARCH BANNER

सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र वणवा प्रकरण : देवरूख न्यायालयाने १० आरोपींना सुनावली २८ मे पर्यंत वन कोठडी

Gramin Varta
165 Views

देवरुख: सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील आंबा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या निवळे आणि गोठणे परिसरात लागलेल्या भीषण वणवा प्रकरणी वन विभागाने धडक कारवाई केली आहे. या मानवनिर्मित वणव्याला कारणीभूत ठरल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण १० आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून, देवरूख न्यायालयाने या सर्व आरोपींना २८ मे २०२६ पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी शाहूवाडी न्यायालयातूनही या प्रकरणातील संशयितांना कोठडी मिळाली होती, त्यानंतर आता देवरूख न्यायालयाच्या या निर्णयामुळे वन विभागाला या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी अधिक वेळ मिळाला आहे.

निवळे आणि गोठणे येथील वनक्षेत्रात ५ मे २०२६ रोजी काही अज्ञातांनी मानवनिर्मित आग लावली होती. या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे वनसंपदेचे आणि वन्यजीवांचे मोठे नुकसान झाले होते. ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावत शर्थीचे प्रयत्न केले होते. आग आटोक्यात आल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाचे धागेदोरे जुळवत वन विभागाने कोतोली धनगरवाडा आणि अंबाईवाडा परिसरामध्ये संशयितांचा शोध सुरू केला.

या तपासाच्या पहिल्या टप्प्यात वन विभागाच्या हाती महत्त्वपूर्ण धागेदोरे लागले आणि त्यांनी बापू बाजू चौगुले याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता या गुन्ह्यात आणखी लोकांचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर तातडीने कारवाई करत बाबुराव येडगे, भागोजी कोळेकर आणि नामदेव येडगे या तिघांना अटक करण्यात आली. या चौघांच्या चौकशीतून आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची व्याप्ती अधिकच वाढली. यानंतर अंबाईवाडा येथील सावळा झोरे, नागेश शेळके, विठ्ठल गावडे, बबन गावडे, धोंडीबा गावडे आणि जनू गावडे या आणखी सहा जणांची नावे निष्पन्न झाली आणि वन विभागाने त्यांनाही अटक केली. या सर्व १० आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी वन कोठडीत केली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासारख्या संवेदनशील आणि सुरक्षित क्षेत्रात वणवा लावणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी वन विभागाच्या पथकाने अत्यंत चोख कामगिरी बजावली आहे. आंबा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली वनपाल सुरेश चरापले, मनिषा देसाई आणि वनरक्षक विशाल पाटील यांच्यासह पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी या संपूर्ण कारवाईत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असून या प्रकरणाचा पुढील तपास वन विभाग करत आहे.

Total Visitor Counter

3425481
Share This Article