माजी उपसभापती अविनाश पराडकर यांनी केला सन्मान
तुषार पाचलकर / राजापूर
तालुक्यातील हरळ गावातील ग्रामस्थ प्रकाश गुरव यांनी समाजात प्रामाणिकतेचा आणि माणुसकीचा सुंदर आदर्श घालून दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पाकीट हरवल्याची माहिती पोस्ट करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश गुरव यांना गावातील एका दुकानाजवळ हे पॉकेट सापडले. त्यांनी तत्काळ सोशल मीडियावर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून पाकिटातील वस्तूंबाबत चौकशी केली. माहिती पडताळल्यानंतर तेच हरवलेले पॉकेट असल्याची खात्री पटली आणि त्यांनी प्रामाणिकपणे ते मालकाला सुपूर्द केले.
हे पाकीट राजापूर तालुक्याचे माजी उपसभापती आणि शिवसेनेचे विद्यमान विभागीय संघटक अविनाश पराडकर यांचे होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पाचल बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाचल एस.टी.थांबा परिसरात पाकीट हरवल्याची माहिती दिली होती.
अविनाश पराडकर यांनी प्रकाश गुरव यांच्या या प्रामाणिकतेचा गौरव करत त्यांचा सन्मान बक्षीस देऊन केला आणि मनःपूर्वक आभार मानले.
ग्रामीण भागात आजही माणुसकी जिवंत असल्याचे हे ताजे उदाहरण हरळ गावाने दाखवून दिले आहे.
राजापूर : हरळ गावच्या प्रकाश गुरव यांनी हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत






