संगमेश्वर : तालुक्यामधून वन्यजीव विश्वाला सुखावणारी एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. सह्याद्रीच्या दुर्गम वन पट्ट्यात असलेल्या एका खासगी मालकीच्या जंगलात थेट ‘रॉयल बंगाल’ जातीच्या पट्टेरी वाघाचे दर्शन घडले आहे. जंगलातील वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बसवण्यात आलेल्या गुप्त कॅमेरा ट्रॅपमध्ये हा अत्यंत दुर्मीळ क्षण हुबेहूब कैद झाला असून, या वृत्ताला संगमेश्वर तालुका वन विभागाने अधिकृत दुजोरा दिला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या या बफरझोन आणि वन क्षेत्रात सुरक्षेच्या कारणास्तव वाघ आढळलेल्या अचूक गावाचे नाव किंवा नेमके स्थान गोपनीय ठेवण्यात आले आहे. मात्र, उत्तर सह्याद्रीच्या अंतर्गत येणाऱ्या आणि ‘एईआरएफ’च्या संवर्धन करारांतर्गत जतन केलेल्या रत्नागिरीतील खासगी वनक्षेत्रातच हा राजाभाऊ वावरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकेकाळी बेसुमार वृक्षतोड आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे पूर्णपणे धोक्यात आलेल्या या जंगलाचे नैसर्गिक रूप पुन्हा मिळवून देण्यासाठी स्थानिक संवर्धकांनी सलग १८ वर्षे अहोरात्र कष्ट उपसले. स्थानिक पातळीवर पर्यावरण आणि वन्यजीवांसाठी पोषक अधिवास तयार करण्यासाठी केलेल्या या दीर्घकालीन तपस्येला आता वाघाच्या रूपाने मोठे यश आले आहे. कोयना अभयारण्यात पट्टेरी वाघ सोडल्यामुळे या संपूर्ण पट्ट्यात वाघांची संख्या वाढण्यास आधीच अनुकूल वातावरण निर्माण झाले होते. त्यातच अन्नसाखळीतील सर्वोच्च शिकारी असलेल्या वाघाचे रत्नागिरीत असे थेट अस्तित्व दिसणे म्हणजे येथील संपूर्ण परिसंस्था अत्यंत सुदृढ आणि जैवविविधतेने नटलेली असल्याचे थेट लक्षण मानले जात आहे. या भागात वाघासाठी लागणारे पुरेसे भक्ष्य, सुरक्षित नैसर्गिक निवारा आणि पर्यावरणीय समतोल उत्तम प्रकारे प्रस्थापित झाल्याचेच हे संकेत आहेत.
या अभूतपूर्व यशामुळे वन्यजीवप्रेमी, पर्यावरणवादी आणि संवर्धन क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये सध्या प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरीसारख्या कोकणी भागात केवळ शासकीय पातळीवरच नव्हे, तर खासगी जंगलांच्या प्रामाणिक संवर्धनातूनही निसर्गाचा एवढा मोठा चमत्कार घडू शकतो, याचे हे एक आदर्श उदाहरण ठरले आहे. या संदर्भात बोलताना सृष्टी ज्ञान संस्था (संगमेश्वर-देवरूख) चे प्रतिनिधी प्रतीक मोरे यांनी सांगितले की, अशा प्रकारे वाघाचे दर्शन घडल्यामुळे आता संपूर्ण परिसरातील वन संवर्धनाची आणि संरक्षणाची जबाबदारी पूर्वीपेक्षा कैक पटीने वाढली आहे. सह्याद्रीचा हा मुख्य वन पट्टा आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील हिरवी वनराई जितकी सुरक्षित राहील, तितकीच येथील वाघांची संख्या भविष्यात वाढण्यास मदत होणार आहे. कॅमेरा ट्रॅपमधील या ऐतिहासिक नोंदीमुळे आता कोकणातील वन संपदेच्या रक्षणाला एक नवी दिशा मिळणार आहे.






