खेड: कोकणातील महत्त्वाचे मानले जाणारे खेड शहरातील छत्रपती संभाजी भाजी मार्केट सध्या धोकादायक स्थितीत असून, येथील गेट क्रमांक दोनचा स्लॅब कोसळल्याने नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी, मार्केटमधील उर्वरित स्लॅबही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेड शहर आणि तालुक्यातील हजारो नागरिक रोज या मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी येतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी छत्रपती संभाजी भाजी मार्केटच्या गेट क्रमांक दोनचा स्लॅब अचानक कोसळला. सुदैवाने त्या ठिकाणी त्यावेळी कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, मार्केटमधील इतर स्लॅबचीही अवस्था अत्यंत वाईट असून, ते कधीही कोसळू शकतात, अशी भीती भाजी विक्रेते व्यक्त करत आहेत. भाजी विक्रेत्यांनी अनेक वेळा खेड नगरपालिका प्रशासनाकडे या धोकादायक स्थितीबाबत तक्रारी केल्या आहेत. मार्केटच्या दुरुस्तीची आणि स्वच्छतेची मागणी वारंवार करण्यात आली आहे, परंतु पालिकेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे.
केवळ स्लॅब कोसळण्याचा धोकाच नाही, तर मार्केटमधील गटारांचीही दुरवस्था झाली आहे. गटारे तुंबली असून, त्यांचे पाणी रस्त्यावर साचले आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डेंग्यूसारखे साथीचे आजार पसरण्याची भीती विक्रेते व्यक्त करत आहेत. एका भाजी विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही वारंवार नगरपालिका प्रशासनाला सांगूनही ते दुर्लक्ष करत आहेत. नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून भाजी घेण्यासाठी मार्केटमध्ये येत आहेत. खेड तालुक्याला भाजीपाला पुरवठा याच मार्केटमधून होतो, तरीही नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे.” असे एका नागरिकाने सांगितले.
मार्केटच्या पाठीमागील बाजूस नव्याने बांधलेल्या गटारांचे काम चुकीच्या पद्धतीने झाल्याने पाणी साचत असल्याचेही निदर्शनास आले आहे. तसेच, मार्केटमध्ये स्वच्छतेसाठी नगरपालिकेचा एकही सफाई कर्मचारी येत नसल्याने सर्वत्र कचरा आणि घाण साचली आहे. यापूर्वी मार्केटमध्ये कचरा गोळा करण्यासाठी जी १७ नंबरची गाडी उभी असायची, ती देखील आता उपलब्ध नाही, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणताही उपयोग होत नसल्याने स्थानिक नागरिक आणि विक्रेते संतापले आहेत. खेड शहराबरोबरच संपूर्ण खेड तालुक्यासाठी ही भाजी मंडी अत्यंत महत्त्वाची असल्याने, नगरपालिका प्रशासनाने आता तरी याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याला नगरपालिका प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.