संगमेश्वर: संगमेश्वर येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प, देवरुख-संगमेश्वर अंतर्गत येणाऱ्या रामपेठ अंगणवाडीतर्फे परसात नावडी येथे वृक्षारोोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमात स्थानिक मान्यवर आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नावडीच्या माजी सरपंच प्रज्ञा कोळवणकर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी मा. सरपंच प्रज्ञा कोळवणकर आणि ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा शेरे यांचे अंगणवाडीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
अंगणवाडीच्या सेविका पल्लवी शेरे यांनी याप्रसंगी पर्यावरणाचा समतोल राखणे, मानवी जीवनात प्राणवायूची गरज, फळे, सावली, फुले तसेच आरोग्याच्या दृष्टीने वनस्पतींचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमाला अंगणवाडीची बालके आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वृक्षारोपणाची गरज स्पष्ट करताना, सध्या महामार्गांच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचे आणि त्याचा परिणाम म्हणून जमिनीत पाणी मुरवण्याची क्षमता कमी झाल्याचे नमूद करण्यात आले. वृक्षांमुळे केवळ ऑक्सिजनच नव्हे, तर जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची आणि जिरवून ठेवण्याची क्षमता वाढते. पिंपळ, वट, आंबा, नारळ यांसारख्या मोठ्या वृक्षांची मुळे प्रचंड प्रमाणात पाणी साठवून ठेवू शकतात. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असला तरी, झाडांची संख्या कमी असल्याने बहुतांश पाणी वाहून नदी आणि समुद्राला मिळाले आहे. जमिनीतील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने भविष्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता असून, त्यासाठी वृक्षारोपण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे महत्त्व प्रतिपादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी मदतनीस शीतल अंब्रे यांनी उपस्थित मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले.