संगमेश्वर: मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ येथे टाटा इन्ट्रा पिकअप गाडी पलटी झाल्याची घटना १५ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून चालक जखमी झाला आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रीतसर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रीतेश रियाज पाटील (वय २२, रा. रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हा आपली टाटा इन्ट्रा पिकअप गाडी (क्र. एम.एच.१३/डी.क्यू/६८०३) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून जात होता. यावेळी मौजे तुरळ येथील न्यू रंगीला राजस्थानी ढाब्यासमोर आल्यानंतर या ठिकाणचा रस्ता एस आकाराचा आणि चढ-उताराचा असतानाही चालकाने रस्त्याची स्थिती लक्षात घेतली नाही. वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने ही पिकअप गाडी रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात चालक रीतेश पाटील याला दुखापत झाली असून गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची फिर्याद संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिकेत अविनाश चव्हाण यांनी दिली असून, पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.
