रत्नागिरी: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरीच्या वतीने गुरुवारी दामले विद्यालयात होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पत्रकारिता केवळ बातम्या लिहिण्यापुरती मर्यादित न ठेवता, ती समाजाशी जोडली जावी, या भावनेतून परिषदेने हा सामाजिक उपक्रम राबवला. या कार्यक्रमाला मराठी पत्रकार परिषदेचे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत वणजू म्हणाले की, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत आणि पैशांअभावी किंवा साहित्याअभावी कोणाचेही शिक्षण थांबू नये, ही आमची भावना आहे. सामाजिक बांधिलकी जपत परिषदेने हा प्रयत्न केला आहे. या उपक्रमाचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. मोटे सर व शिक्षकवृंदाने कौतुक केले. पत्रकार केवळ समाजाचा आरसा नसून त्यांनी आज दाखवलेली सामाजिक संवेदनशीलता प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमास दामले शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोटे सर, सर्व शिक्षक, पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत वणजू, जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके, जमीर खलफे, भालचंद्र नाचणकर, कांचन मालगुंडकर, अवनी पिलणकर, सचिन बोरकर, तन्मय दाते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
