रत्नागिरी : वाढता मानसिक ताण, धावपळीचे जीवन आणि डिजिटल उपकरणांवरील अति-अवलंबित्व यामुळे तरुण पिढीमध्ये विस्मरणाची समस्या वेगाने वाढत आहे. सध्या ३० ते ४५ वयोगटातील तरुणांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टी विसरणे, एकाग्रतेचा अभाव आणि निर्णय घेताना होणारा गोंधळ अशा तक्रारी घेऊन न्यूरॉलॉजी क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण चिंताजनक रितीने वाढले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, मोबाइल आणि स्क्रीन टाइमचा अतिवापर हे यामागे मुख्य कारण असून, मेंदूच्या माहिती साठवण्याच्या क्षमतेवर याचे खोलवर परिणाम होत आहेत.
सतत येणारे नोटिफिकेशन्स आणि मल्टीटास्किंगच्या सवयीमुळे मेंदूला विश्रांती मिळत नाही, तर अपुरी झोप आणि शारीरिक निष्क्रियता यांमुळे स्मरणशक्ती अधिकच क्षीण होत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. विशेषतः नोकरदार वर्ग, व्यावसायिक आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य, चिंता आणि मानसिक थकवा यांसारख्या लक्षणांमुळे विस्मरणाचे प्रमाण अधिक आढळत आहे. मोबाइलवर सर्व माहिती साठवण्याच्या सवयीमुळे मेंदूचा वापर करण्याची सवय कमी झाली असून, ही समस्या गंभीर होण्यापूर्वीच वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. विस्मरणाची समस्या म्हणजे नेहमीच गंभीर आजार नसला, तरी ती सातत्याने जाणवत असेल, तर जीवनशैलीत बदल आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे हेच यावर उपाय असल्याचे न्यूरॉलॉजिस्टनी स्पष्ट केले आहे.
