मुंबई:महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीयपंथीयांनाही एसटी प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या आगामी बैठकीत या सवलतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
या निर्णयामुळे २०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील चार लाख तृतीयपंथीयांना दिलासा मिळणार असल्याचे मानले जाते.
कर्नाटक राज्यात महिलांसाठी असलेल्या मोफत बसप्रवास योजनेमध्ये तृतीयपंथीयांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत महिलांना सध्या एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली जाते. ही बाब अत्यंत स्वागतार्ह असून, राज्यातील तृतीयपंथीय घटकही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. ते मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. महिलांप्रमाणेच तृतीयपंथीयांनाही एसटी प्रवासात ५० टक्के सवलत मिळावी, अशी मागणी तृतीयपंथीय कल्याणकारी मंडळ महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा सान्वी जेठवाणी यांनी केली. या वेळी शिवानी गजबर आणि पवन यादव हेही उपस्थित होते.