राजापूर: राजापूर तालुक्यातील शिवणे बुद्रुक गावात तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा जमीन खचल्याची घटना घडली आहे. ओणी-वडदहसोळ रस्त्यावर शिवणे येथे हा प्रकार घडल्याने वाहनधारकांना सावधगिरी बाळगण्यासंबंधीचे फलक लावण्यात आले आहेत. शिवणेत पुन्हा एकदा जमीन खचल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2009 नंतर पुन्हा तीच स्थिती
यापूर्वी सन 2009 मध्ये शिवणे बुद्रुक येथेच जमीन खचण्याचा प्रकार घडला होता. विशेष म्हणजे, आता ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, त्याच ठिकाणी तेव्हाही जमीन खचली होती. यावर्षी मे महिन्यात पावसाने लवकर सुरुवात केली, त्यानंतर मान्सूनपूर्व आणि मोसमी पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून, तालुक्यातील पश्चिम भागाला याचा मोठा फटका बसला आहे.
या पावसामुळेच शिवणे बुद्रुक येथील प्रमुख रस्ता खचला आहे. संबंधित खात्याने खबरदारी म्हणून खचलेल्या रस्त्यावर ‘वाहने सावकाश चालवा’ अशा आशयाचा फलक लावला आहे. मात्र, वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे येथील रहिवाशांच्या मनात सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.