वाडी वाडीत जाऊन केला ‘नेटवर्कचा पंचनामा’
रत्नागिरी: उक्षी परिसरातील जिओ नेटवर्कच्या दुरवस्थेमुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांनी अखेर रत्नागिरीतील जिओ कार्यालयात धडक दिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने गावात दाखल होऊन नेटवर्कच्या समस्यांचा पंचनामा केला आहे. उक्षी गावामध्ये गेल्या काही वर्षांपासून जिओ नेटवर्कचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, याचा मोठा फटका दैनंदिन कामकाजाला बसत आहे.
उक्षी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून जिओ नेटवर्कची सेवा अत्यंत विस्कळीत झाली असून, यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. नेटवर्क नसल्यामुळे ग्रामपंचायतीचे दाखले, महा-ई-सेवा केंद्रातील कामे, शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, तलाठी कार्यालयातील कामकाज आणि इतर अनेक महत्त्वाची ऑनलाइन कामे ठप्प झाली आहेत. वारंवार तक्रारी करूनही जिओ कार्यालयाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.
या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी अखेर संतप्त ग्रामस्थांनी रत्नागिरी येथील जिओ कार्यालयात धडक दिली आणि आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. ग्रामस्थांच्या तीव्र रोषामुळे जिओ व्यवस्थापनाने तत्काळ दखल घेत दुसऱ्याच दिवशी तांत्रिक टीम उक्षी गावात पाठवली. टेक्निकल टीम कडून रोहन कांबळे आणि मंदार घवाळी यांनी उक्षी गावातील प्रत्येक वाडीत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नेटवर्कचा डेटा गोळा करून आणि विविध ठिकाणचे लोकेशन व फ्रीक्वेन्सी तपासून समस्यांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला.
गावात ५जी नेटवर्क कशा प्रकारे पुरवता येईल आणि तांत्रिक त्रुटी कशा दूर करता येतील, याचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम तांत्रिक टीमने हाती घेतले आहे. येत्या आठ दिवसांत हा अहवाल सादर करून तातडीने नेटवर्कची समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले आहे. आता जिओ कंपनी दिलेल्या मुदतीत ही समस्या सोडवते की नाही, याकडे उक्षी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
यावेळी माजी सरपंच तथा प्रशासक सौ.किरण जाधव,माजी सरपंच मिलिंद खानविलकर,अन्वर गोलंदाज, तसेच अब्दुल मुनाफ खतिब, मुखत्यार काझी,अकबर काझी,रवींद्र जाधव, रेहान खान,इस्माईल काझी,अमोल देसाई,स्वप्नील देसाई,गौरव सावंत, मेहरान काझी, मुझम्मील काझी, ताबिश राजापकर, युसुफ हमदारे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
