तरवळ/अमित जाधव : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील एका भटक्या गायीवर प्रसूती दरम्यान ओढलेल्या जीवघेण्या प्रसंगातून बाहेर काढून तिला नवीन जीवदान देण्याचे काम मालगुंड येथील काही प्राणी मित्रांनी केल्याचे पहिला मिळाले. त्यामुळे समाजामध्ये प्राण्यांविषयी आजही लोकांच्या मनात आपुलकी प्रेम आहे हे या प्रसंगावरून दिसले.
मालगुंड येथील विठ्ठल मंदिराच्या आवारात एका भटक्या गायीला प्रसूत वेदना सुरू झाल्या आणि ती प्रसूत होताना गायीचे पूर्ण अंग बाहेर आले होते. अगदी मरणासन्न अवस्थेत असलेली गाय ही कधीही मृत्युमुखी पडली असती. पण याची माहिती मिळताच मालगुंड परिसरातील काही प्राणी प्रेमी त्याठिकाणी आले त्यामध्ये रत्नागिरी येथील शल्यचिकित्सक डॉ स्वरूप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पशू सहायक निलेश वाघमारे, दिलीप बापट, सदानंद केळकर, उमेश केळकर, भूषण खरे, राजू खरे शांताराम झोरे यांनी डॉक्टरांच्या मदतीने त्या मरणासन्न अवस्थेत पडलेल्या गायीचे अंग आत ढकलून तीच्यावर उपचार केले व तिला या कठीण प्रसंगातून बाहेर काढले व तीची चांगल्या प्रकारची प्रसूती करून तिला व तिच्या नवजात बाळाला नवीन जीवदान देण्याचे काम या सर्व मंडळींनी केले. तसेच या गायीला योग्य माणसाच्या ताब्यात देण्यात आले.
आज समाजात आपण पाहतोय प्राणीमात्रांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले जात आहेत. त्यांना कत्तल खाण्या पर्यंत घेऊन जाण्यातही लोक मागेपुढे पाहत नाहीत. पण या प्रसंगावरून दिसून येते की समाजामध्ये अजूनही लोकांच्या मनात प्राणिमात्रांविषयी आपुलकी आहे, प्रेम आहे. या सर्व मंडळींनी निःस्वार्थी पणे हे जे महत्त्वाचे केलेले काम खरोखर कौतुकास्पद आहे, त्यामुळे या सर्व प्राणीमित्र मंडळींचे परिसरातून कौतुक केले जात आहे.
