GRAMIN SEARCH BANNER

‘सेल्फी पॉइंट’ ते भंगार: ‘बसरा स्टार’ जहाजाचा मिऱ्या किनाऱ्यावर शेवट!

Gramin Varta
18 Views

तब्बल ५ वर्षांनंतर जहाज भंगारात

रत्नागिरी: रत्नागिरीच्या मिऱ्या किनाऱ्याची शान बनलेला आणि स्थानिकांसाठी एक महत्त्वाचा ‘सेल्फी पॉइंट’ ठरलेला, ‘बसरा स्टार’ नावाचा महाकाय जहाज अखेर भंगारात निघत आहे. गेल्या पाच वर्षांपासून समुद्राच्या लाटांचा मारा झेलत उभे असलेले हे ३५ कोटी रुपयांचे जहाज आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. सध्या पावसाळी वातावरणातही, हे जहाज सुरक्षितपणे तोडण्याचे काम सुरू झाले आहे.

२०२० साली आलेल्या एका वादळात, ‘बसरा स्टार’ हे जहाज गुजरातहून केरळला जात असताना त्याच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. समुद्रातील प्रचंड लाटांमुळे ते मिऱ्या किनाऱ्यावर येऊन आदळले. त्यावेळी, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या (NDRF) मदतीने जहाजावरील कॅप्टन आणि सर्व खलाशांना सुखरूप वाचवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर हे जहाज त्याच ठिकाणी पडून राहिले. पाच वर्षे समुद्राच्या पाण्याचा आणि लाटांचा सततचा मारा सहन केल्यामुळे ते पूर्णपणे गंजले होते आणि त्याचा काही भाग वाळूत रुतला होता. त्यामुळे त्याची डागडुजी करणे शक्य झाले नाही.

अखेरीस, राज्य आणि केंद्र सरकारच्या आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर, हे जहाज भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी, हे जहाज २ कोटी रुपयांना विकत घेतलेल्या भंगार विक्रेत्याने जहाजाचे तुकडे करण्यास सुरुवात केली आहे. क्रेनच्या मदतीने जहाजाचे मोठे भाग तोडून जमिनीवर आणले जात आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने समुद्र खवळलेला असून, मोठ्या लाटा जहाजाला धडकत आहेत. त्यामुळे, हवामानाचा अंदाज घेऊन अत्यंत सुरक्षितपणे हे काम पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. जहाजाचे आधीच दोन भाग झाले असून, ते दोन वेगवेगळ्या दोरखंडांनी बांधून ठेवण्यात आले आहेत.

मिऱ्या किनाऱ्यावर यापुढे फक्त ‘बसरा स्टार’ची आठवणच उरणार आहे. एकेकाळी अनेकांचे लक्ष वेधून घेणारे हे जहाज आता भंगारात जमा होऊन इतिहासजमा होईल. भंगार साहित्याच्या संरक्षणासाठी एक वॉचमनही या ठिकाणी नियुक्त करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3200539
Share This Article