रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप परिसरातून भरदिवसा चार लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महेश श्रीपाद काटदरे रा. शिवाजीनगर रत्नागिरी यांनी आपली पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी विटारा ब्रिझा गाडी (क्र. एम.एच.०२ ईके २३०२) रविवार दि. ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास साळवी स्टॉप येथील जोशी मेडिकलसमोर उभी करून ठेवली होती. दरम्यानच्या काळात कोणातरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची कोणतीही संमती नसताना लबाडीच्या इराद्याने ही चारचाकी गाडी चोरून नेली.
गाडी जागेवर नसल्याचे लक्षात येताच परिसरात शोध घेण्यात आला मात्र गाडी मिळून आली नाही. अखेर याप्रकरणी महेश काटदरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १४३/२०२६ अन्वये नोंद केला आहे. वर्दळीच्या ठिकाणाहून भरदिवसा गाडी चोरीला गेल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.





