पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू हाेत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
त्यापैकी ८ लाख ६५ हजार ७४० मुलगे, ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण ५ हजार १११ मुख्य केंद्रांवर ही परीक्षा हाेणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष डाॅ. नंदकुमार बेडशे यांनी ही माहिती दिली.पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा हाेत आहे. या परीक्षेसाठी एकूण २३,६८३ शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. १८ मार्च राेजी शेवट हाेणार आहे. दरम्यान, बारावी परीक्षेत घडलेल्या काॅपी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बैठे पथक वाढवण्यावर भर दिला आहे. दहावी बाेर्डाच्या एकूण ५,१११पैकी १९१ केंद्र संवेदनशील आहेत. ही बाब विचारात घेऊन प्रशासनाकडून जिल्हा दक्षता समिती मार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असावी, असा आमचा प्रयत्न हाेता. पण, ५५४ केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध हाेऊ शकली नाही, असेही डाॅ. बेडशे यांनी स्पष्ट केले.
राज्यात १६ लाख १५ हजार विद्यार्थी आजपासून देणार दहावीची परीक्षा







