रत्नागिरी: भाट्ये समुद्राच्या किनाऱ्यावर बेदरकारपणे गाडी चालवून स्टंटबाजी करणे एका थार गाडी मालकाला चांगलेच महागात पडले आहे. भरतीचे पाणी आणि वाळूचा योग्य अंदाज न आल्याने त्यांची चारचाकी भर समुद्रात वाळूत रुतून बसली, ज्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सध्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांकडून आणि तरुणाईकडून गाड्या भरधाव वेगाने नेऊन स्टंटबाजी करण्याचे प्रकार वाढले आहेत. वेगाच्या आणि थराराच्या नादात अनेकदा हे लोक भरतीच्या पाण्याची किंवा समुद्रातील वाळूची परिस्थिती तपासत नाहीत. आज घडलेली घटना याच बेफिकीरीचे ताजे उदाहरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित थार गाडी चालक भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर आपली गाडी घेऊन गेले होते. समुद्राच्या अगदी जवळ गाडी नेऊन ते स्टंट करण्याचा प्रयत्न करत असावेत, मात्र भरतीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आणि गाडी वाळूत खोलवर रुतून बसली. यामुळे गाडी काढण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. स्थानिक नागरिक आणि इतरांच्या मदतीने अखेर गाडी बाहेर काढण्यात यश आले.
समुद्रकिनाऱ्यांवर अशा प्रकारच्या घटनांमुळे पर्यावरणाची हानी होण्यासोबतच स्वतःच्या आणि इतरांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने अशा स्टंटबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांनीही समुद्राजवळ गाडी चालवताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आता जोर धरू लागले आहे.