GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतीचे काम ३५ टक्के काम पूर्ण

Gramin Varta
26 Views

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला आता हवाई संपर्काच्या माध्यमातून नवे बळ मिळणार आहे. जिल्ह्यातील विमानतळाच्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाच्या कामांना मोठा वेग आला असून, या प्रकल्पामुळे रत्नागिरीची हवाई कनेक्टिव्हिटी भक्कम होणार आहे. त्याचा थेट लाभ जिल्ह्याच्या पर्यटन, उद्योग आणि रोजगार क्षेत्राला मिळणार असून विकासाची नवी दारे खुली होणार आहेत.

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या (एमएडीसी) माध्यमातून रत्नागिरी विमानतळाचा विस्तार व सुधारणा सुरू आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गेल्या काही वर्षांपासून या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना आता यश मिळत असून, आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांनीही या कामासाठी विशेष लक्ष घातले आहे. त्यांनी नुकतीच विमानतळ परिसराला भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामांचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतीचे काम सुरू असून, त्याचे सुमारे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही इमारत पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. याशिवाय नेव्हिगेशनसाठी लागणाऱ्या डीव्हीओआर प्रणालीसाठी आवश्यक ७.२२ हेक्टर जमीन लवकरच कोस्टगार्डला हस्तांतरित केली जाणार आहे. विमानतळाच्या भविष्यकालीन गरजांसाठी आणि कमी दृश्यमानतेत विमानांची सुरक्षित लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमसाठी तसेच विस्तारासाठी ५ ते ७ हेक्टर जमिनीचे संपादन सुरू असून, त्यातील ७ हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

विमान वाहतुकीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या टॅक्सी ट्रॅकच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, हे ट्रॅक कार्यान्वित झाल्यानंतर विमानांची ये-जा अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे. शहरातून विमानतळापर्यंत केबल टाकण्याचे काम सध्या स्थगित असून, यावर लवकरच बांधकाम विभाग आणि प्रशासनाकडून निर्णय घेतला जाणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्हा हवाई नकाशावर ठळकपणे उभा राहणार असून, येथील स्थानिक नागरिक, व्यावसायिक, पर्यटन व्यवसायिक आणि रोजगार शोधणाऱ्या तरुणांना त्याचा थेट फायदा होणार आहे. शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने रत्नागिरी विमानतळाचा चेहरामोहरा बदलणार असून, कोकणच्या दळणवळण विकासात हा एक मैलाचा दगड ठरणार आहे.

Total Visitor Counter

3073033
Share This Article