रत्नागिरी : निसर्गसौंदर्य आणि पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याला आता मद्यपानाच्या विक्रमी आकड्यांमुळे नवे, पण चिंताजनक ओळख मिळत आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल १ कोटी १० लाख लिटर मद्याचा खप झाला असून, या आकडेवारीने सर्वच स्तरांवर खळबळ उडवली आहे. या मद्यमहापुरात बिअरचा वाटा सर्वाधिक असून ५९ लाख लिटर बिअरची विक्री झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.
एकंदरीत पाहता रत्नागिरीतील तळीरामांनी मद्यपानात कसलीच कसर सोडलेली नाही. विदेशी मद्याचा खपही तब्बल ३४ लाख लिटरवर पोहोचला आहे, तर देशी दारूचा खप २० लाख लिटर आणि वाईनचा खप १ लाख लिटरपर्यंत नोंदवला गेला आहे. हे आकडे स्पष्टपणे दर्शवतात की, जिल्ह्यातील नागरिक मद्यपानात पुढे असून, त्याचबरोबर सरकारच्या तिजोरीचीही भरभराट झाली आहे.
मद्यविक्रीच्या या विक्रमी आकड्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा दारूविक्री आणि उत्पादनाविरोधात कठोर मोहीम सुरू केली आहे. गेल्या एका वर्षात विविध ठिकाणी कारवाया करत विभागाने ३ हजारांहून अधिक गुन्हे नोंदवले आहेत. या कारवायांमध्ये १३ वाहने जप्त करण्यात आली असून, अंदाजे ४० हजार लिटर हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे. एकूण २ कोटी ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मद्याचा खप झपाट्याने वाढत असतानाच त्याला आळा घालण्यासाठी आणि बेकायदा व्यवहार थांबवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने घेतलेली धडक भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, समाजाच्या आरोग्यविषयक दृष्टीने वाढत्या मद्यपानाच्या प्रवृत्तीवर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आता आली आहे.