राजापूर : राजापूर तालुक्यातील कळसवली गावच्या ग्रामसेविका सोनाली हिवाळे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, त्यांना ‘आदर्श पर्यावरण मित्र’ या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
बुलढाणा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या पहाट फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय पर्यावरण संवर्धन परिषद व पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात मिसेस इंडिया विजेत्या श्वेता परदेशी, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, डॉ. हरीश साखरे, डॉ. अविनाश गेडाम, पहाट फाऊंडेशनच्या अर्पिता सुरडकर, अमोल भिलंगे, सोमनाथ चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
सोनाली हिवाळे या कळसवली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका असून, ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत त्यांनी गावात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या याच कामाची दखल घेत पहाट फाऊंडेशनतर्फे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
ग्रामसेविका म्हणून त्यांनी घेतलेला पुढाकार व कार्याची तळमळ ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी अशा योगदानाची गरज असून, हिवाळे यांच्या कार्यामुळे गावातील नागरिकांमध्येही पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली आहे.
राजापूर: ग्रामसेविका सोनाली हिवाळे यांना ‘आदर्श पर्यावरण मित्र’ पुरस्काराने गौरव

Leave a Comment