GRAMIN SEARCH BANNER

रत्नदुर्गवरील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तरुणावर गुन्हा

Gramin Search
13 Views

रत्नागिरी: रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्याजवळ समुद्रात पडून झालेल्या सुखप्रित कौर या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जसमिक केहर सिंग असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

मुलीच्या वडिलांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी सुखपित व तिचा मित्र जसमिक केहर सिंग हे अनेक वर्षापासून प्रेमसंबंधात होते. मात्र जसमिक याने अन्य मुलीशी जवळीक साधून माझ्या मुलीशी असणारे संबंध तोडले. तसेच तिचा मानसिक छळ केला अशी तक्रार तिच्या वडिलांनी शहर पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांकडून आत्महत्येस पवृत्त केल्याचा गुन्हा जसमिक याच्याविरुद्ध दाखल केला. 

आपल्या लेकीच्या अशा अचानक आणि दु:खद अंतामुळे सुन्न झालेल्या वडिलांनी काल रत्नागिरीत येऊन घटनास्थळाला भेट दिली. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी एकच आर्त सवाल केला,“माझी मुलगी आत्महत्या करणार नव्हती… तिचा घात झाला आहे!”

सुखप्रितचे वडील प्रकाशसिंह कौर यांनी उपस्थित केलेले प्रश्न प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज अधोरेखित करतात. “जर तिला खरोखर आत्महत्या करायचीच होती, तर ती नाशिकमध्ये केली असती ना? रत्नागिरीला का आली?” असा सवाल त्यांनी अत्यंत व्यथित मनाने केला. सुखप्रित ही नाशिकमधील आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. तिच्या राहत्या ठिकाणी पोलिसांना मिळालेल्या बॅगेत एक चिठ्ठी सापडली त्यात तिने लिहिले आहे की, “मी संकटात अडकले आहे. मी कोणाला सांगू शकत नाही. मी काय करू? मला समजत नाही.”

ही घटना घडण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी, म्हणजे शुक्रवारी, सुखप्रितने आपल्या वडिलांना फोन केला होता. त्यानंतर शनिवारीपासून तिचा फोन पूर्णतः बंद आला.
या संदर्भात बोलताना प्रकाशसिंह कौर यांनी भावनांचा बांध फोडत अत्यंत गंभीर आरोप केला ,“हरामजादेने फोन केला. तोच मुलगा तिला फोन करत होता.”

हे बोलताना त्यांचा स्वर केवळ संतापाचा नव्हता, तर हतबलतेने भरलेला होता.एका वडिलांचा, ज्यांनी आपली मुलगी गमावलेली आहे आणि न्याय मागण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच उरलेले नाही.

सुखप्रित काही काळापूर्वी मनीपाल कॉलेज, बेंगळूरु येथे बँकेच्या प्रशिक्षणासाठी गेली होती. तिथेच एका तरुणाशी तिची ओळख झाली होती. तिच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या तरुणाने प्रेमाचे खोटे नाटक रचले आणि तिच्या भावनांशी खेळ केला.
याच तरुणाच्या ओळखीमुळे ती नाशिकहून दोन वेळा रत्नागिरीला आली होती, असे तिच्या मैत्रिणीने कुटुंबीयांना सांगितले आहे.

आज शुक्रवारी त्या मुलीच्या वडिलांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत जासमिक याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

Total Visitor Counter

2647863
Share This Article