खेड: मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथील सीएनजी पंपासमोर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. आज ९ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली.
मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी ट्रिबल कार क्रमांक एमएच ०८ एएक्स ६४९६ वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार प्रथम महामार्गावरील डिव्हायडरला जाऊन धडकली. त्यानंतर ती अनियंत्रित होऊन बाजूच्या लेनमध्ये शिरली आणि समोरून चिपळूणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वॅगनार कार क्रमांक एमएच ४३ सीके ८८४० वर जोरदार धडकली. या भीषण धडकेत मयुरेश ढेबे, सायली शिर्के, अभिषेक शिर्के आणि मानसी प्रधान हे चार जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण गव्हर्मेंट रेस्ट हाऊसजवळ तैनात असलेली जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानची २४ तास आपत्कालीन सेवा देणारी रुग्णवाहिका अवघ्या काही वेळात घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या तातडीच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.






