संगमेश्वर: देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधनाचा सण आता केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीचे रूप घेत आहे. देशभरातील महिला, लहान मुली आणि शाळांमधील विद्यार्थी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना पोस्टाने राख्या पाठवतात किंवा प्रत्यक्ष जाऊन त्यांच्यासोबत हा सण साजरा करतात.
याच पार्श्वभूमीवर आंबेड बुद्रुक गावातील पोस्टमन सुनील शिगवण यांच्या माध्यमातून अंतरा फाउंडेशन रत्नागिरी या आंबेड बुद्रुक येथील सेवाभावी संस्थेमार्फत सीमेवरील जवानांना रक्षाबंधन निमित्त राख्या पाठविण्यात आल्या आहेत.
अहोरात्र सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या त्यागाला आणि धैर्याला सलाम करण्यासाठी तसेच भारत मातेचे रक्षण करताना त्यांचे धैर्य वाढविण्यासाठी महिला भगिनी सदैव आपल्या पाठीशी आहेत, हाच संदेश या राखीमधून देण्यात आला आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





