रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथील फ्लायओव्हर वरून अखेर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याची प्रतीक्षा होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक फ्लायओव्हरवरून सुरू करण्यात आल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र, संगमेश्वरहून रत्नागिरीच्या दिशेने येणारी वाहतूक सध्या या फ्लायओव्हरवरून बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या दिशेने येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असताना एकेरी वाहतूक सुरू झाल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निवळी येथील सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या मार्गावरून वाहन चालवणे वाहनचालकांसाठी जिकिरीचे ठरत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि खराब झालेल्या पृष्ठभागामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मुख्य महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी सर्व्हिस रोडची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता संबंधित यंत्रणेने सर्व्हिस रोडची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
अधिकृत माहिनीनुसार निवळी आणि कोलाड उड्डाणपूल या पुलांच्या कामांना गती देण्यात आली असली तरी तांत्रिक कारणांमुळे किंवा अपूर्ण कामांमुळे गणेशोत्सवादरम्यान येथून संथ गतीने किंवा सेवारस्त्यांवरून (Service Roads) वाहतूक वळवली जाण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले.





