ब्रेकिंग: रत्नागिरी धक्कादायक प्रकार! गुरांच्या कत्तल करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला, पनवेल येथील दोघे ताब्यात

Gramin Varta
650 Views

फणसवळे येथील प्रकाराने खळबळ, ग्रामस्थ संतप्त

रत्नागिरी : तालुक्यातील मधलीवाडी, फणसवळे परिसरातील जंगलात बेकायदेशीर गोवंश कत्तलीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांशी संशयितांनी हुज्जत घालत हल्ल्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, एक संशयित पसार झाला आहे.

जंगलाच्या आडोशाला सुरू असलेल्या या कथित कत्तलीची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच संशयितांकडून विरोध करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोन जणांना ताब्यात घेतले, तर एक जण घटनास्थळावरून फरार झाला.

या घटनेमुळे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ल्याचा प्रयत्न करण्याची हिंमत नेमकी कुणाच्या बळावर आली? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. केवळ दोन संशयितांना ताब्यात घेऊन प्रकरण संपवू नये, तर या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, कत्तलीसाठी जनावरे कुठून आणली जात होती आणि या प्रकाराचे व्यापक जाळे आहे का, याचा तपास करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, पसार झालेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे.

या प्रकरणातील दोषींवर कोणताही मुलाहिजा न ठेवता कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी सकल हिंदू समाज, रत्नागिरी यांच्याकडून करण्यात आली आहे. पोलिसांच्या कायदेशीर कारवाईला पूर्ण पाठिंबा देत, या घटनेमागील संपूर्ण साखळी उघड करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Total Visitors :
4796786
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *