रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी पुलावर मध्यभागी मालाणे भरलेल्या एका कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात घडला. चालक सलीम मेवती यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट डोंगराला जाऊन धडकला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून, महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांना तातडीने रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलीम मेवती हे आपल्या ताब्यातील मालाने भरलेला कंटेनर घेऊन जात असताना अंजनारी पुलाजवळ अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले. महामार्गावरील मोठा अपघात टाळण्याच्या प्रयत्नात कंटेनर थेट शेजारील डोंगराला धडकला. या धडकेमुळे कंटेनर महामार्गाच्या मधोमध उलटला, ज्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या चालकाला विनाविलंब ॲम्बुलन्सद्वारे रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले, ज्यामुळे चालकाला वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली.
त्यानंतर महामार्गावर मधोमध पडलेला आणि वाहतुकीस अडथळा ठरणारा कंटेनर पोलिसांच्या पथकाने क्रेनच्या साहाय्याने सुरक्षितपणे बाजूला हटवला आणि ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत सुरळीत केली.
महामार्ग पोलिसांच्या या अत्यंत सतर्क आणि कौतुकास्पद कामगिरीत API /घुले साहेब पोलीस शिपाई जाधवर, पोलीस शिपाई अनिल शिंगाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश जाधव आणि पोलीस हवालदार योगेश दोरखंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या जलद आणि नियोजनबद्ध कार्यवाहीमुळे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला असून प्रवाशांनी व स्थानिक नागरिकांनी महामार्ग पोलीस पथकाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.






