रत्नागिरी: जिल्ह्यात ओबीसी समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने बैठक आयोजित करण्यात आली आहे. ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी संघर्ष समन्वय समितीतर्फे येत्या सोमवारी (दि.७ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता कुणबी भवन (जे. के. फाइल्स स्टॉपजवळ, रत्नागिरी) येथे ही बैठक होणार आहे.
सध्या राज्य तसेच देशपातळीवर ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर आंदोलने सुरू असून, जातनिहाय जनगणना हा त्यातील प्रमुख विषय आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील ओबीसी समाजानेही आपले हक्क व अधिकारांसाठी संघटित होऊन सक्रिय भूमिका घेण्याची गरज असल्याचे आवाहन ओबीसी जनमोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष शरद्चंद्र गीते यांनी केले आहे. ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर एकजुटीने आवाज उठवण्याची आवश्यकता असून, समाजातील विविध घटकांनी संघटित होऊन पुढे येणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी व्यापक लढा उभारण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. राज्य व देशपातळीवरील ओबीसी आंदोलनाची सद्यस्थिती, जातनिहाय जनगणना तसेच ओबीसी समाजाच्या हक्क आणि अधिकारांच्या प्रश्नांवर ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर मार्गदर्शन करणार आहेत.





