GRAMIN SEARCH BANNER

राजापूर ओणी-दैतवाडी येथे बसला अपघात, चार प्रवासी सुखरूप

Gramin Varta
13 Views

तुषार पाचलकर / राजापूर : तालुक्यातील ओणी-अनुस्कुरा मार्गावरील ओणी-दैतवाडी येथे आज सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास पाचलहून राजापूरकडे जाणारी एसटी बस (क्रमांक MH 14 BT 2992) रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीमुळे आणि समोरून आलेल्या भरधाव चारचाकी वाहनाला वाचवताना घसरली. सुदैवाने, या घटनेत बसमधील चालक, वाहक आणि दोन प्रवासी असे चौघेही सुखरूप आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचलहून राजापूरच्या दिशेने निघालेली ही एसटी बस ओणी-दैतवाडी येथील एका तीव्र वळणावर आली. या वळणावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे, ज्यामुळे समोरून येणारे वाहन सहजासहजी दिसत नाही. त्याचवेळी समोरून एक भरधाव चारचाकी वाहन आले. चालकाने प्रसंगावधान राखून बसला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्त्याच्या कडेला असलेली झाडी आणि पावसामुळे निसरडा झालेला रस्ता यामुळे बस रस्त्याच्या कडेला उतरवली असता चरात फसली. ही बस राजापूर आगारातून सुटली होती.

या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्याच्या कडेची वाढलेली झाडी न काढल्याने असे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच, ओणी-अनुस्कुरा मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या पट्ट्या (शोल्डर) खराब झाल्या आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना पावसाळ्यात गाडी चालवताना अडचणी येत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
प्रशासनाने नागरिकांना आणि वाहनचालकांना पावसाळ्याच्या दिवसांत सावकाश आणि सुरक्षित वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अशा संभाव्य अपघातांना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देशही दिले आहेत.

Total Visitor Counter

2645307
Share This Article