GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग:उक्षी घाटात चारचाकीचा अपघात; दाम्पत्य किरकोळ जखमी

Gramin Varta
28 Views

रत्नागिरी/ समीर शिगवण: वांद्री-उक्षी-मिरजोळे-रत्नागिरी महामार्गावरील उक्षी-करबुडे घाटात एका चारचाकी गाडीचा अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती छोट्या दरीत कोसळली. या अपघातात गाडीत असलेले पती-पत्नी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.

ज्ञानेश्वर गुरव (५९) आणि त्यांच्या पत्नी वनिता ज्ञानेश्वर गुरव (५१) हे दाम्पत्य त्यांच्या एमएच ०८ एएक्स १०१५ या क्रमांकाच्या गाडीतून उक्षीहून रत्नागिरीच्या दिशेने जात होते. उक्षी घाटातील चढण चढत असताना अचानक गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला धडकून सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळली.

अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संदेश जोशी, पोलीस पाटील अनिल जाधव, तसेच उक्षी गावातील सावंतवाडी, देसाईवाडी आणि गराटेवाडी येथील ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी जखमींना गाडीतून बाहेर काढण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू केले.

अपघातग्रस्त दाम्पत्याला एका खाजगी गाडीतून तात्काळ रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Total Visitor Counter

3375161
Share This Article