वडिलांच्या डोळ्यांसमोर वाहून गेली पत्नी अन् दोन मुली
यवतमाळ : जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील दहेली येथे अडान नदीच्या पुलावरून जात असताना पुराच्या प्रवाहात इर्टिगा कार वाहून गेल्याची भीषण घटना घडली असून, या दुर्घटनेत एका महिलेसह दोन मुली बेपत्ता झाल्या आहेत, तर पतीने झाडाचा आधार घेत अत्यंत थरारक रितीने आपला जीव वाचवला आहे. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत अविनाश खंदारे हे आपल्या कुटुंबासह वाहनेवरून गावी परतत असताना, दहेली येथील अडान नदीवरील पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचे वाहन पुलावर येऊन बंद पडले आणि पुराच्या वेगवान प्रवाहामुळे वाहन पलटी होऊन थेट नदीत वाहून गेले.
या भयानक संकटातही अविनाश खंदारे यांनी प्रसंगावधान राखत वाहनाचा दरवाजा उघडून बाहेर पडत झाडाचा आधार घेतला आणि स्वतःचा जीव वाचवला; परंतु त्यांची पत्नी माधवी अविनाश खंदारे, आणि दोन मुली तेजू अविनाश खंदारे व प्रांजली अविनाश खंदारे या तिघी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, मुसळधार पाऊस आणि नदीतील वाढलेला तीव्र प्रवाह यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण होत असले तरी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बेपत्ता झालेल्या तिघींचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.







