नागपूर : नागपूरजवळील कन्हान नदीच्या पुलावर एका तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नासाठी केलेला तगादा आणि पोलिसांत दाखल केलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून प्रियकरानेच तरुणीला नदीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे नागपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत तरुणीचे नाव अश्विनी ऊर्फ आशी डे असून आरोपीचे नाव मोनू ऊर्फ आकाश किशोर मनपिया असे आहे. दोघांमध्ये मागील काही काळापासून प्रेमसंबंध होते. पोलिसांच्या माहितीनुसार, अश्विनी ही आरोपीकडे लग्नासाठी आग्रह करत होती. तसेच तिने आरोपीविरोधात यापूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घ्यावी यासाठी आरोपीकडून तिच्यावर दबाव टाकला जात होता. मात्र, तिने तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
याच वादातून आरोपीने अश्विनीला कन्हान नदीच्या पुलावर नेल्याचा आरोप आहे. तेथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात आरोपीने तिला मारहाण करून पुलावरून नदीच्या पात्रात ढकलून दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
घटनेच्या वेळी जवळच असलेल्या एका रेल्वे ट्रॅकमॅनने हा प्रकार पाहिला आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी वेगाने कारवाई करत अवघ्या १८ तासांत आरोपी मोनू मनपिया याला अटक केली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कन्हान पोलीस करत असून, या हत्येमागील संपूर्ण कारणांचा उलगडा करण्यासाठी चौकशी सुरू आहे.
“ज्याच्यावर प्रेम केलं, त्यानेच तिचे संपवलं आयुष्य! कन्हान पुलावर प्रियकराचा रक्तरंजित कांड”
Leave a Comment






