चिपळूण : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे रोहिदास समाजातील बांधवांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्हा रोहिदास समाज सेवा संघाच्या वतीने चिपळूण येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या घटनेतील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, रविवार (दि. २ ऑगस्ट) रोजी गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे रोहिदास समाजातील काही बांधवांना काही तरुणांनी अडवून त्यांचा छळ केला. त्यानंतर रॉड व लाठीच्या साहाय्याने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याच्या धमक्यांसह जातीवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद वर्तन करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
अशा प्रकारच्या गंभीर आणि भ्याड हल्ल्याचा रत्नागिरी जिल्हा रोहिदास समाज सेवा संघाने तीव्र निषेध व्यक्त केला असून, संबंधित आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा या प्रकरणात न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश खेडेकर, जिल्हा सचिव गणेश बाबुराव सरनकर, जिल्हा उपाध्यक्ष अजित आंबवकर, वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदेश मोहिते, गुहागर तालुकाध्यक्ष विजय जानवळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विनोद जानवळकर, अशोक जानवळकर, तेजस कोंडविलकर, सचिन कोंडविलकर, संदीप कोंडविलकर, भिकुराम जानवळकर, सुधीर जानवळकर, रघुनाथ जानवळकर, विनोद चिपळूणकर, सुजय जानवळकर, नितेश चिपळूणकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शृंगारतळीतील हल्ल्याचा निषेध; रोहिदास समाज सेवा संघाचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन
Leave a Comment





