मुंबई: राज्यात ६ राष्ट्रीय उद्याने तसेच ५२ अभयारण्ये, २८ संवर्धन राखीव क्षेत्रे तसेच सहा व्याघ्र राखीव वने आहेत. या जंगल परिसरात विविध कारणांमुळे प्राणी, पक्षी जखमी होत असतात. अशा पक्षी तसेच प्राण्यांवर उपचार करून त्यांचे संवर्धन करता यावे यासाठी वन्यजीव अपंगालये सुरू करण्यात येत असून यावर्षी २३ ठिकाणी ही अपंगालये उभारण्यात येणार असून यासाठी ३९ कोटी ६८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्यात व्याघ्र प्रकल्पांबरोबरच अभयारण्यात विविध प्राण्यांचे संवर्धन केले जाते. यात अनेक प्राण्यांच्या जाती-प्रजाती या दुर्मिळ आहेत. जंगलातील अधिवासात या प्राण्यांवर अन्य प्राण्यांकडून होणारे हल्ले, वणवे, वादळे यात हे प्राणी जखमी होत असतात. या प्राण्यांवर तत्काळ उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्यासाठीच्या सुविधा वनक्षेत्रात फार कमी प्रमाणात आहेत. अशा प्राण्यांवर उपचार करून त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी प्राणी अपंगालयाची स्थापना वन विभागाकडून करण्यात येत आहे.
या अपंगालयांत कायम अपंगत्व आलेल्या प्राण्यांची देखभाल करणे, मानवी जीवितास धोकादायक असलेल्या प्राण्यांना वेळप्रसंगी कायमचे जेरबंद करण्याकरिता वन्य प्राणी बचाव केंद्रांची अर्थात ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरची निर्मतीही याअंतर्गत करण्यात येणार आहे. याकरिता विविध क्षेत्रीय स्तरावर उपयुक्त अशी आधुनिक उपकरणांनी सुसज्ज वाहने उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या प्राण्यांवरील उपचारासाठी दवाखाने व अपंगालये उभारण्यात येणार आहेत, यासाठी १५२ कोटी ६० लाखांचा निधी प्रस्तावित करण्यात आला असून यापैकी ३९ कोटी ६८ लाखांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. या निधीतून २३ ठिकाणी ही अपंगालये उभारण्यात येणार आहेत.
या ठिकाणी उभारणार अपंगालये
सिरोंचा, सांगली, सोलापूर, नागपूर, ताडोबा अभयारण्य चंद्रपूर, साताऱ्यात दोन ठिकाणी, सावंतवाडी, आलापल्ली, भंडारा, वर्धा, जुन्नर, पुणे दोन ठिकाणी, वन्यजीव विभाग अकोला, पेंच व्याघ्रप्रकल्प नागपूर, पांढरकवडा वन्यजीव विभाग, पुणे वन्यजीव विभाग, शहापूर, नाशिक, डहाणू, जळगाव, बुलढाणा येथे ही अपंगालये उभारण्यात येणार आहेत. सर्वाधिक ३ कोटी ५५ लाखांचा निधी हा ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथील अपंगालयासाठी देण्यात आला आहे.
राज्यात २३ ठिकाणी वन्यजीवांसाठी अपंगालय; सरकारकडून ३९ कोटींचा निधी मंजूर
Leave a Comment






