ब्रेकिंग: रत्नागिरीतील कुर्ली समुद्रकिनारी मासेमारी नौकेला अपघात;सातही खलाशी सुखरूप

Gramin Varta
261 Views

रत्नागिरी : शहरानजीक असलेल्या कुर्ली गावच्या समुद्रकिनारी एका मासेमारी नौकेचा मोठा अपघात होता होता टळला आहे. सोसाट्याचा वादळी वारा आणि इंजिनच्या पंख्यामध्ये कचरा अडकल्यामुळे नियंत्रण सुटलेली ही नौका सुदैवाने कुर्ली किनाऱ्याला लागली. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेत बोटीवरील सर्व सातही खलाशी सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मोहम्मदमिया इब्राहिम मस्तान यांच्या मालकीची ‘अल रिझवान’ ही नौका मासेमारीसाठी समुद्रात उतरली होती. कुर्ली समुद्रकिनारी मासेमारी करत असताना नौकेच्या पंख्यात जाळे व कचरा अडकल्याने बोट निकामी झाली. त्याचवेळी समुद्रात सोसाट्याचा वारा सुरू असल्याने बोट वाऱ्याच्या वेगाने किनाऱ्याला येऊन धडकली. या दुर्घटनेत मासेमारी नौकेचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

मागील दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरील हवामान बिघडले असून वादळी वाऱ्याचा जोर वाढला आहे, तसेच खोल समुद्रात पाण्याचा प्रवाह तीव्र झाला आहे. यामुळे अनेक मच्छीमारांनी हंगामाच्या सुरुवातीलाच नौका किनाऱ्यावर नांगरून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच शनिवारी सायंकाळी घडलेल्या या प्रसंगामुळे मच्छीमार बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले, तरी सर्व खलाशी सुखरूप परतल्याने सुटकेचा निःश्वास सोडला जात आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4745458
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *