चिपळूण : तालुक्यातील रिकटोली गावावर पुन्हा एकदा दरडीचे संकट घोंघावत असून, गावातील सुमारे २०० ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात डोंगरभागातील माती व दगड घसरून दरड कोसळण्याची शक्यता वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रिकटोली परिसरातील धोकादायक डोंगरभागामुळे यापूर्वीही दरडीचा धोका निर्माण झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यातही परिस्थिती चिंताजनक बनली असून, संभाव्य दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरड कोसळल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असल्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
धोकादायक ठिकाणाची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारावी, दरडप्रवण भागाची सुरक्षितता तपासावी आणि भविष्यात दरडीचा धोका टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सुमारे २०० नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याने शासन व प्रशासनाने रिकटोली गावातील परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
चिपळूण: रिकटोली गावावर पुन्हा दरडीचे सावट; सुमारे २०० ग्रामस्थांचा जीव धोक्यात
Leave a Comment





