रत्नागिरी : येत्या शनिवार, ५ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या दहीकाला उत्सवासाठी जिल्ह्यात गोविंदा पथके पूर्णपणे सज्ज झाली असून यंदा एकूण २ हजार ५७८ दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पथकांकडून कसून सराव केला जात असून शहरासह ग्रामीण भागातही प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
यावर्षी जिल्ह्यात २८५ सार्वजनिक आणि २ हजार २९३ खासगी दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सार्वजनिक दहीहंड्यांच्या संख्येत १८७ ने घट नोंदवली गेली असली, तरी खासगी दहीहंड्यांमध्ये १५ ने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीय पक्षांनीही या उत्सवाचे औचित्य साधत लाखो रुपयांची घसघशीत बक्षिसे जाहीर केल्याने गोविंदा मंडळांमधील चुरस शिगेला पोहोचली असून, बक्षिसांवर नाव कोरण्यासाठी आणि जल्लोष साजरा करण्यासाठी मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.





